Thursday, June 19, 2008

खलिता

खालचं पत्रं खरं तर लिहीलं आहे एका मैत्रिणीसाठी. गेले कित्येक महिने एक laptop विकत घेण्यासाठी मी आणि तिचा भाऊ तिच्या मागे लागलो आहोत. उद्देश हा की voice chat करून तरी भरपूर गप्पा मारता येतील. कारण नाहीतर long distance फोन करून मनसोक्त बोलणं, नेहमीच होतं असं नाही. पण महिनोंमहिने लोटले तरीही laptop घरी यायला काही मुहूर्तच लागत नाहिये. काही ना काही फालतू कारणं! त्यामुळे मी आणि तिचा भाऊ दोघही खूप वैतागलो होतो. एक दिवस त्याबद्दल बोलता बोलता असं ठरलं की बोलून काहीही उपयोग होत नाहिये, तर एक खरमरीत पत्र लिहू आणि म्हणून हे पत्र पोस्टाने (email ने नाही) दिलं पाठवून तिच्या पत्त्यावर.


श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर आणि सौभाग्यवती अलकनंदा उदयराज नाईक-निंबाळकर,


पत्र लिहिण्यास कारण की, एक अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडण्यास आपण उभयतां अती विलंब करीत आहात आणि त्यामुळे होणार्‍या परीणामांचे तीव्र पडसाद देशाच्या फक्त पश्चिम भागातच नव्हे, तर पूर्व भागातूनही उमटायला सुरूवात झालेली आहे, ह्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. कामगिरी काय आहे, ते आपणास चांगलेच ठाऊक असल्याने, त्याची आठवण करून देण्याची आवश्यकता आम्हांस भासत नाही. आजवर अनेक वेळा, त्यासंदर्भात आपणाशी चर्चा करूनही इच्छित कार्य सफल झालेले दिसत नाही. त्यामुळे आमच्या सहनशक्तीचा आता अधिक अंत न पाहता त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी असा कडक इशारा देण्यासाठी हा पत्रप्रपंच करण्यची वेळ आम्हावर येउन ठेपली आहे.

आपणांस आपल्या जवाबदारीची जाणीव आहे परंतु कार्य तडीस नेण्यासाठी पुरेसा अवधी उपलब्ध नाही अशी जर आपली तक्रार असेल, तर त्यावर आमचे एवढेच म्हणणे आहे की ‘काढल्याशिवाय’ वेळ मिळणे कठीण! आणि ह्या कामगिरीचे महत्त्व जर आपणांस समजले असेल, तर वेळेचे पद्धतशीर नियोजन करून, ह्यासाठी थोडा वेळ बाजूला काढून ठेवणे, आपणांस अवघड जावू नये, अशी माफक अपेक्षा आम्ही बाळगून आहोत.

कामगिरीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ आपणाकडे नाही अशी जर विवंचना असेल तर तसे तपशीलवारपणे त्वरीत कळवावे. परंतु, श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर ह्याचा कारभार अतिशय सुरळीतपणे चालू असून, आपणांस कशाचीही ददात नसल्याचे समजते. आजच आम्हांस मिळालेल्या माहितीप्रमाणे, श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर ह्यांच्या वार्षिक वेतनात भरगोस वाढ जाहीर झाल्याचेही समजते. जर आपणांस आपल्या कामाचा नियमीत मोबदला मिळण्यास, भोसलेसरकारांकडून दिरंगाई होत असेल तर तसेही स्पष्टपणे (कोणाचीही तमा न बाळगता) कळवावे. भोसलेसरकारांच्या कार्यालयीन प्रमुखाची कानउघडणी करण्याचे आदेश देण्याची व्यवस्था करण्यात येईल. अशा प्रकारच्या तक्रारींमुळे आपणावर कोणतीही आच ओढवणार नाही असे अभय आम्ही आपणास देत आहोत.

ह्याइतर जर कोणती समस्या आपणांस भेडसावत असेल (नेमून दिलेल्या कामगिरीचे संदर्भातच फक्त) तरी सविस्तरपणे कळवावे. त्यावर तोडगा काढण्यासाठी यथाशक्ती मदत देण्याचे आश्वासनही आम्ही ह्या पत्राद्वारे देत आहोत. आम्ही आमच्या शब्दांस जागतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. त्यामुळे मदतीची अपेक्षा असल्यास निःसंकोचपणे बोलून दाखविण्यास हरकत नाही.

शहाण्याला शब्दाचा मार’ ह्यावर आमचा विश्वास असल्याने आपणाकडून कार्यास कितीही विलंब होत असला तरीही कोणत्याही कायदेशीर कारवाईचे आदेश आम्ही अजून दिलेले नाहीत. ह्याचा मान राखून तातडीने कार्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलावीत.

सौभाग्यवती अलकनंदा उदयराज नाईक-निंबाळकर ह्यांचे कनिष्ठ बंधू चिरंजीव धर्मकुमार गायकवाड ह्यानीही ह्यासंदर्भात आमच्याकडे लेखी तक्रार नोंदवलेली आहे. आपणाकडून होत असलेल्या विलंबामुळे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे नु्कसान होत असल्याचे त्यांनी कळवले आहे. जर आपणाकडून त्वरीत कार्यसिद्धी झाली नाही, तर त्यांच्या नुकसानभरपाईसाठी, आपणांस जातीने इकडे येण्याचे आदेश देण्यावाचून, दुसरा पर्याय आम्हांस उरणार नाही, ह्याची दखल घ्यावी. मात्र, अशा प्रकारच्या नुकसानभरपाईदाखल केल्या गेलेल्या मोहिमेसाठी, कोणतेही आर्थिक सहकार्य करण्याची तरतूद आमच्या नियमांत बसत नाही, ह्याचेही भान असू द्यावे.

आमच्या मर्जीविरुद्ध आपणावर कारवाई करण्याची वेळ आम्हावर आणू नये, अशी विनंतीवजा सूचना करून, हे पत्र समाप्त करण्यात येत आहे.


आपली,

सौभाग्यवती सुषमाराजे सयाजीराव सरनौबत.


खूप दिवसांनी (पत्र पोचायलाच बहुतेक तेवढा वेळ लागला) फोन आला. "सौभाग्यवती सरनौबत आहेत का? मी सौभाग्यवती नाईक-निंबाळकर बोलत आहे पुण्यनगरीतून!” नंतर बराच वेळ आम्ही दोघीही हसत बसलो. माझं आडनाव सरनौबत नाही आणि तिचंही नाईक-निंबाळकर नाही आणि ह्या पत्राचाही तिच्या घरी laptop यायला काहीही उपयोग झाला नाही हे वेगळं सांगायची गरजच नाही.


Saturday, May 31, 2008

बाप

एका रात्री अचानक तिचा बाप गेला. बातमी कळताक्षणी ती तडक निघाली. नवराही होताच बरोबर. तोच रस्ता तिच्याघरापासून ते तिच्या बापाच्या घरापर्यंतचा. त्यावरून तिने कितीतरी वेळा जा ये केली असेल. पण त्या दिवशी तिला तो वेगळाच वाटला. काय वेगळं होतं त्या दिवशी? फक्त एक जाणीव. आपला बाप गेला आहे ह्याची. आता तो परत कधीही भेटणार नाही ह्याची. एक भयंकर अस्वस्थ करून टाकणारी जाणीव. सैरभैर अवस्थेत ती बापाच्या घरी पोचली. समोर ठेवलेल्या बापाच्या निश्चेतन देहाकडे बघून तिला भयंकर कसंतरी झालं. आपल्यातली सगळी शक्ती निघून गेली आहे असं वाटलं. इतका वेळ धीराने अडवलेले अश्रू बाहेर आले.

केवढा आधार होता तिला नुसता बापाच्या असण्याचा सुद्धा! बापाचं वय ७७. तिचं ५०. ह्या ५० वर्षात किती तरी वेळा बापनं तिला आधार दिला. सल्ला दिला. बाप म्हणून करायचं ते सगळं काही केलेचं पण त्याहीपेक्षा कितीतरी जास्तं. जगायचं कसं ते शिकवलं त्यानं. कधी मित्रं बनून तर कधी बाप बनून. जेव्हा जेव्हा ती खचली, हरली तेव्हा तेव्हा बापनं तिला धीर दिला. अशावेळी तो साधचं काहीतरी बोलून जायचा आणि तिला त्यातून पुढचा मार्ग दिसायचा. जेव्हा जेव्हा ती जिंकली, यशस्वी झाली तेव्हा तेव्हा बापानं तिचं कौतुक केलं. तिचं छोटसं यशही त्यानं साजरं केलं. त्यापुढे अजून बरचं काही मिळवण्यासाठी तिला सतत प्रोत्साहनही दिलं.

बापचं असणं तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. कामाच्या व्यापात दिवसेंदिवस भेट झाली नाही तरीही फोनवरून मिनिटं बोलणं तिच्यासाठी पुरेसं असायचं. जीवनातं काय काय घडतयं ह्याचा तपशील एकदा बापाला दिला की तिला बरं वाटायचं. काही चुका झाल्या असतील तर त्या एकदा बापासमोर बोलून दाखवल्या की तिला हलकं हलकं वाटायचं.

पण आता तो नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिला आणि एकाएकी गेला. त्याचं वय तसं झालेलं होतं पण तब्येत ठणठणीत होती. आज ना उद्या तो जाणार ह्याची तिला कल्पना होती. पण तरीही जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग आला तेव्हा तो पेलणं फार अवघड गेलं तिला.

त्या दिवशी स्वतःच्या बापाबद्दल ती जे काही बोलली ते माझ्या बापानं मला सांगितलं. त्यावेळी तो तिथेच होता. मला म्हणाला की मी गेल्यानंतर तू माझ्याबद्दल जे काही बोलली असतीस ते आणि तसचं बोलली ती.

मी हादरले. मला अचानक तिच्या दुःखाची खोली जाणवल्यासारखं वाटलं. माझ्यावरचं तो प्रसंग आला आहे असं क्षणभर वाटलं.

मला माझ्या बापाच्या असण्याचा किती आधार आहे हे जाणवलं. आजपर्यंत कितीतरी अवघड प्रसंग आले माझ्या आयुष्यात. प्रत्येक वेळी माझ्या बापानं मला दिशा दाखवली. काय करू काय नको ते ही सांगितलं. मी ही त्याचं ऐकत गेले आणि माझं भलचं झालं.

त्या दिवशी मी त्याला विचारलं, “तू गेल्यावर मी काय करू? खूपच अवघड होउन बसेल सगळं माझ्यासाठी आणि तू ही नसशील नेहमीप्रमाणे मला सावरायला.”

तो हसला आणि म्हणाला, “अगं, मी आहे अजूनही. नाही जाते एव्हढ्यात!”

मी म्हटलं, “थट्टा सुचतीय तुला? तुला बरयं, तू जाशील निघून. मी कायं करू तेव्हा?”

तो म्हणाला, “काय करणार? दिवस दुःख कर आणि मग रोजच्या कामाला लाग. सगळे दैनंदीन व्यवहार चालू कर. मग आपोआप सगळं ठीक होइल.”

मीबरंम्हटलं. आणखीन तरी वेगळं काय करण्यासारखं होतं? मला फक्त बरं एवढचं वाटत होतं की माझा बाप जाईल तेव्हाच्या अशक्यप्राय वाटणारया प्रसंगाला कशी सामोरी जाउ ह्याचं उत्तर मी माझ्या बापाकडूनच मिळवलं होतं. आजपर्यंत प्रत्येक वेळी त्याचं ऐकत आले त्यामुळे ह्याही वेळी कितीही अवघड वाटलं तरीही त्याचं ऐकेन असं मनाशी ठरवून टाकलं होतं.

मग विचार आला की रोज ह्जारो जणं मरतात. त्यातले कितीतरी कोणाचे कोणाचे तरी बाप असतीलच ना? त्यांच्या मुलांनाही असचं वाटत असेल?